आचरा (मालवण) : सध्या कोकणात सर्वत्र मुसळधार पाऊस सुरू आहे. या पार्श्वभूमीवर, कोकण मराठी साहित्य परिषदेच्या मालवण शाखेतर्फे ‘पाऊस शब्दसुरांचा’ या छोट्या साहित्य संमेलनाचे नुकतेच आचरे गावात आयोजन करण्यात आले होते.
‘समीप निर्मळ नदी वाहते, ईशकृपेने डुलती शेते
महादंड माडांची झुलती, हरितछत्र चामरे
कलासक्त हे गुणीजन मंडित, पुण्यग्राम आचरे’
आचरे गावाचे सुपुत्र, दिवंगत कवी विद्याधर करंदीकर यांनी अशा कवितेतून आचरे गावाचे वर्णन केले आहे. अशा निसर्गरम्य आचरे गावातील बागजामडूल बेटावर जामडूल रिसॉर्टमध्ये हा कार्यक्रम पार पडला. ‘कोमसाप’च्या मालवण शाखेचे अध्यक्ष सुरेश ठाकूर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. रुजारिओ पिन्टो (केंद्रीय सल्लागार, कोमसाप), जेरोन फर्नांडिस (सभापती, वित्त व बांधकाम समिती, जि. प. सिंधुदुर्ग), डॉ. विनायक करंदीकर, रामचंद्र आंगणे (उपशिक्षणाधिकारी, जि. प. सिंधुदुर्ग), मधुसूदन नानिवडेकर, (गलझकार), रवींद्र वराडकर, अशोक कांबळी, सुनंदा कांबळे, बाबाजी भिसळे, माधव गावकर, जयप्रकाश परुळेकर, लक्ष्मणराव आचरेकर आदी मान्यवर या वेळी उपस्थित होते.
रुजारिओ पिंटो यांनी पावसाची छत्री उघडून, माधव गावकर यांनी मेघमल्हार राग गाऊन आणि डॉ. विनायक करंदीकर यांनी कार्यक्रमाला शुभेच्छा देऊन या साहित्य सोहळ्याचे उद्घाटन केले. श्रावणी प्रभू, अनिरुद्ध आचरेकर, नितीन प्रभू यांनी शब्दसुरांनी, तर भावना मुणगेकर आणि कामिनी ढेकणे यांनी गुलाबपुष्प देऊन सर्व मान्यवरांचे स्वागत केले.
नवनाथ भोळे यांनी रामेश्वर प्रतिमापूजन केले. केशवसुत प्रतिमापूजन अनिरुद्ध आचरेकर यांनी केले, तर सरस्वती प्रतिमापूजन पांडुरंग कोचरेकर यांनी केले. चंद्रकांत माने यांनी अक्षरोत्सव दालनाचे उद्घाटन केले. भावना मुणगेकर, कामिनी ढेकणे यांनी दीपप्रज्ज्वलन केले.
‘कोमसाप’च्या महिला विभागाच्या भावना मुणगेकर, कामिनी ढेकणे, सायली परब, मृणालिनी आचरेकर, मानली फाटक, मधुरा माणगावकर, अनघा कदम, अनुराधा आचरेकर, श्रावणी प्रभू आदींनी ‘जय शारदे वागेश्वरी’ ही प्रार्थना सादर केली. ज्येष्ठ नागरिक बाबाजी भिसके, संजय परब, लक्ष्मण आचरेकर, अशोक कांबळी यांनी वसंत बापट लिखित ‘गगन सदन तेजोमय’ हे गीत सादर करून कार्यक्रमाची रंगत वाढविली. त्यांना तबलासाथ नितीन प्रभूंनी, तर हार्मोनिअमसाथ अनिरुद्ध आचरेकर यांनी केली.
यानंतर ‘अरे, आमचे नाते कवितेशी’ या विषयावर गझलकार मधुसूदन नानिवडेकर यांचे व्याखान झाले. कविता कशी स्फुरते, कशी लिहावी, कशी सादर करावी याबाबत त्यांनी मार्गदर्शन केले. कवी आणि गीतकार यातील फरक त्यांनी समजावून दिला. त्या वेळी त्यांनी आपल्या काही कविता, गझला सादर केल्या. त्याला सर्वांनी दाद दिली.
मराठी, मालवणी आणि कोकणी कवितांच्या काव्यसंमेलनाने या साहित्यसोहळ्यात रंगत आणली. रुजारिओ पिंटो (कोकणी), सुनंदा कांबळी (मालवणी) आणि मधुसूदन नानिवडेकर (मराठी) यांनी कविता सादर केल्या. सूत्रसंचालन सुरेश ठाकूर यांनी केले.
या कार्यक्रमात कथावाचन आणि कथाकथन यांचे दोन उत्कृष्ट नमुने अनुक्रमे चंद्रशेखर हडप आणि सरिता पवार यांनी सादर केले. सरिता पवार यांनी ‘फेरो’ ही स्वलिखित मालवणी कथा सादर केली. अंधश्रद्धेवर प्रकाश पाडणारी ही कथा सर्वांनाच चिंतन करायला लावणारी ठरली. त्यानंतर चंद्रशेखर हडप यांनी ‘मरणसंवाद’ ही स्वरचित कथा सादर केली. भूतकथा, भयकथा आणि विज्ञानकथा यांचा मिलाफ असणारे हडप यांचे कथाकथन सर्वांना आवडले.
कोमसाप मित्र दिवंगत नारायण महादेव मयेकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ अक्षर प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. शिक्षण क्षेत्रापासून कलाक्षेत्रापर्यंत, राजकारणापासून समाजकारणापर्यंत आणि क्रीडा क्षेत्रापासून विज्ञानक्षेत्रापर्यंतच्या विविध क्षेत्रातील ख्यातनाम व्यक्तींच्या हस्ताक्षरांचे नमुने सर्व उपस्थितांचे लक्ष वेधून घेत होते. तळेरे येथील पत्रकार निकेत पावसकर यांनी हा अनमोल संग्रह केला आहे. यशश्री ताम्हणकर हिने आपल्या आजोबांवर आधारित कविता सादर केली.
कोमसाप साहित्यिक लेखक प्रमोद कोयंडे, बाबुराव घाडीगावकर, भूषण दत्तादास (कवी), वैभवी चौकेकर (लेखिका), तसेच बारावीच्या परीक्षेत जिल्ह्यात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेली आस्था संजय जाधव आदींचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
प्रत्येक कवीला आपले गाव प्रिय असते. आपल्या गावाचे वर्णन कोकणातील ज्या कवींनी आपल्या काव्यात केले आहे, त्यांच्या कवितेवर आधारित ‘जाऊ कवींच्या गावा’ हा कवितेचा संगीतमय कार्यक्रमही या वेळी झाला. त्यात कवी केशवसुत, कवी माधव, कवी बा. भ. बोरकर, कवी विंदा करंदीकर, कवी वसंत सावंत, कवी विद्याधर करंदीकर, कवी मंगेश पाडगावकर आणि मालवणी कवी रुजारिओ पिंटो यांच्या कविता या कार्यक्रमात सादर झाल्या. माधव गावकर यांच्या गायनाने रंगलेल्या या कार्यक्रमाला सुरेश ठाकूर, कल्पना मलये, उज्वला धानजी यांच्या अभ्यासपूर्ण निवेदनाची जोड होती. संगीत साथ पंकज परब यांची होती. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गुरुनाथ ताम्हणकर व तेजल ताम्हणकर यांनी केले.